
दिल्लीत कमळ फुललं! ‘झाडू’ची जादू फेल अन् काँग्रेसचा सुपडासाफ
‘भाजप’ २७ वर्षांनंतर सत्तेत!
विदर्भ प्रजासत्ताक
दि.८नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपला ४८ जागा तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.१९९३ मध्ये भाजपने पहिल्यांदा दिल्ली निवडणूक जिंकली होती. २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीचे तख्त पालटण्यात यश आले.
आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची आकडेवारी पाहता दिल्लीत आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता असून भाजपकडे सध्या 44 जागा आहेत. त्यामुळे आता तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता दिल्लीतआली आहे.देशात सत्ता असतानाही देशाची राजधानी आपल्या ताब्यात नाही याची सल भाजपच्या मनात होती. यासाठी यंदाची निवडणूक काहीही करून जिंकायची यासाठी भाजपचे मोठी फिल्डिंग लावली होती. हीच भाजपची रणनीती आता यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकसंघ नसल्याचा मोठा फटका आपला बसला. दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्रित निवडणूक लढवली होती. तेव्हा सन्मानजनक मतदानाची टक्केवारी मिळाली होती. मात्र, विधानसभा निवडणूक ही वेगवेगळी लढवली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या टीममधील प्रमुख नेत्यांना तुरुंगात जावे लागले. केवळ अरविंद केजरीवाल नव्हे तर अरविंद केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख चेहऱ्यांना तुरुंगात जावे लागले. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण केजरीवालांना चांगलेच भोवले. सोबतच भाजपच्या सूक्ष्म नियोजनाचा पत्ताच आम आदमी पक्षाला लागला नाही.
दुसरीकडे भाजपने सगळ्याच निवडणुकांप्रमाणे अत्यंत सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचे केले होते. दिल्लीत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात. या सर्व भागातील मतदाराला आकर्षित करण्यासाठी देशाच्या सर्व भागातून नेतेमंडळी भाजपने दिल्लीत बोलावली. या सगळ्या नेत्यांनी दिल्लीतील मतदारांशी संवाद साधला. राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असल्यास विकास गतीने होऊ शकतो, ही भावना रुजवण्यासाठी घरोघरी जाऊन संवाद साधला. छोट्या छोट्या बैठका घेतल्या, याचा फायदा भाजपाला झाला. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर पद्धतशीरपणे नियोजनबद्ध हल्ले चढवण्यात आले, अरविंद केजरीवाल यांचे शीशमहल अथवा मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण अशी एक एक प्रकरणे आम आदमी पक्षाच्या विरुद्ध भाजपने पद्धतशीरपणे समोर आणली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या योजना आम आदमी पक्षाच्या होत्या त्या योजना आम्ही बंद करणार नाही, त्या सुरूच ठेवून त्यासोबत आणखी चांगल्या योजना दिल्लीकरांना देऊ असे भाजपने म्हटले होते. या सगळ्या गोष्टी अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध गेल्याचे निकालातून दिसून येते.
दिल्लीतील विजयानंतर PM मोदी आज कार्यकर्त्यांना संबोधित करणार
स्पष्ट बहुमतासह मोठ्या विजयाकडे दिल्लीत भाजपची घोडदौड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात संध्याकाळी ७.३० वा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.